समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठ्याची भिस्त ग्रामपंचायतींनी उभारलेल्या यंत्रणेवरच   

पुणे : महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या गावांमध्ये महापालिकेच्या वतीने अद्याप तरी पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे या गावांमधील पाणीपुरवठ्याची भिस्त ग्रामपंचायतींनी उभारलेल्या यंत्रणेवरच अवलंबून आहे. महापालिका हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत वेगाने नागरीकरण झाल्याने पाणी पुरवठ्याची यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे महापालिकेकडून समाविष्ट गावांतील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
 
महापालिका हद्दीत १९९८ ला २३ गावे, डिसेंबर २०१२ मध्ये येवलेवाडी, ऑक्टोबर २०१७ मध्ये लोहगांव, साडेसतरा नळी, केशवनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, पिसोळी, आंबेगांव बु., आंबेगाव खु. धायरी, उत्तमनगर, शिवणे ही ११ गावे आणि जून २०२१ मध्ये औताडे-हंडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बु., कोंढवे-धावडे, कोपरे, गुजर निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, वाघोली, जांभूळवाडी, केळेवाडी, मांगडेवाडी, भिलारवाडी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, नर्हे, म्हाळुंगे, सूस, बावधन बु. या २३ गावांचा समावेश झाला.
 
महापालिकेच्या मूळ हद्दीतील नागरिकांना मिळणार्‍या विविध सेवा सुविधा टप्प्याटप्याने समाविष्ट गावांमधील नागरिकांनाही मिळतील, अशी आशा होती. मात्र, गावांमधील नागरिक जेवढा कर महापालिकेला देतात, त्या तुलनेत गावांमध्ये विकास कामे झालेली नाहीत. गावांमध्ये मुलभूत सेवा सुविधा देण्यासाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढ्या निधीची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात केली जात नाही. परिणामी, महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी म्हणण्याची वेळ गावांमधील नागरिकांवर आली आहे.
 
समाविष्ट गावांमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेने शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. मात्र, ही योजना सुरू केल्यानंतर सरकारने प्रथम ११ आणि नंतर २३ गावांचा समावेश महापालिकेत केल्याने या गावांना समान पाणीपुरवठा योजना लागू नाही. त्यामुळे महापालिकेकडून ग्रामपंचायतीने उभारलेल्या यंत्रणेचा वापर करून पाणीपुरवठा केला जात आहे. ही गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर झपाट्याने नागरिकरण वाढल्याने ग्रामपंचायतीने उभारलेली यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
 
सद्य:स्थिती काय...
 
महापालिकेने समाविष्ट बावधन बुद्रुक, सुस, म्हाळूंगे, लोहगांव, वाघोली या पाच गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू केली आहेत.शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, कोपरे या चार गावांमध्ये असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना ताब्यात घेऊन त्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ३३ एमएलडीची योजना आहे. महापालिका सध्या १६ ते १७ एमएलडी पाणी या योजनेद्वारे देत आहे.
 
उर्वरीत गावांचे गट तयार करून १२ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी विकास आराखडा तयार करून तो मान्यतेसाठी सरकारकडे पाठवला आहे. यासाठी ५०० कोटी निधीची मागणी केली आहे. या १२ गावांसाठी ८९० कोटींचा खर्च आहे. पहिला टप्पा ६०६ कोटीचा अपेक्षित आहे.समाविष्ट गावांना महापालिकेकडून दिवसाला एक हजारपेक्षा अधिक टँकर पाणीपुरवठा केला जातो.
 
घरे महागली; पण पाणी नाही
 
महापालिकेचे पाणी मिळणार आहे, सेवा सुविधा मिळणार आहेत, असे सांगून बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना चढ्या किंमतीमध्ये घरे विकली. बांधकामांना परवानगी घेताना महापालिकेची योजना होऊपर्यंत आम्ही पाणीपुरवठा करू, असे लेखी महापालिकेला व पीएमआरडीएला दिले. मात्र, घरे विकल्यानंतर हात वर केले. त्यामुळे नागरिकांना महाग घरे घेऊन पाण्यासाठी खासगी टँकर धारकांना महिन्याला हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
 
महापालिका हद्दीमध्ये गावांचा समावेश झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटेल असे वाटले होते. बांधकाम व्यावसायिकाने खोटे सांगून घरे विकली. मात्र, आता आमच्याकडे महापालिका लक्ष देत नाही आणि बांधकाम व्यावसायिकदेखील लक्ष देत नाही, त्यामुळे आम्हाला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
 
- भारत माने, नागरिक (नर्‍हेगाव)

Related Articles